जनप्रतिनिधींचा दरबार

Posted in News on Feb 11, 2014

एमएमआरडीए बांधणार आठ नवे उड्डाणपूल

ऐरोली- कल्याणला जोडणारा नवा भुयारीमार्ग

 

सिडकोतर्फे उर्वरित सुविधा भूखंडांचे पालिकेला लवकरच होणार हस्तांतरण

 

नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई शहरातील महत्वाच्या नागरी समस्या व विकासकामांच्या अनुषंगाने पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचा आज वाशी येथे विशेष जनप्रतिनिधी दरबार यशस्वीपणे पार पडला. या जनप्रतिनिधींच्या दरबारात शासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. एनएमआरडीएचे आयुक्त यु.पी. एस मदान यांनी नवी मुंबईत एमएमआरडीए मार्फत ८ नवे उड्डाणपूल उभारले जाणार असल्याची माहिती दिली. त्याशिवाय ऐरोली येथील डोंगरातून ऐरोली व कल्याण यांना जोडणारा नवा भुयारी मार्ग प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली. चित्रफितीच्या माध्यमातून नवी मुंबईची सध्याची परिस्थिती व भविष्यात क्लस्टर विकास आणि वन टाइम योजनांच्या माध्यमातून साकारणारे आधुनिक शहर याबाबतचा आढावा उपस्थित अधिकारी, जनप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यापुढे मांडण्यात आला.

नवी मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर घडावे अशी पालकमंत्री ना. गणेश नाईक यांची धारणा आहे. हे स्वप्न साकारत नागरिकांना रचनात्मक सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने उच्चस्तरीय अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आज विशेष बैठक घडवण्यात आली. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या जनप्रतिनिधीच्या दरबारात एमएमआरडीए चे आयुक्त यु.पी.एस मैदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव,ठाणे जिल्हाधिकारी री.पी. वेलरासू,खासदार डॉ. संजीव गणेश नाईक ,आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे, पालिका सभागृह नेते अनंत सुतार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष  गोपीनाथ ठाकूर तसेच शासनाच्या विविध विभागाचे उच्च अधिकारी, लोक प्रतिनिधी , विविध संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी मुंबई शहराचा विकास साधत असताना येथील महानगर पालिका, सिडको एमआयडीसी या तीनही नियोजन प्राधिक रणांची सांगड घालून देण्याचा विशेषत्वाने प्रयत्न या जनप्रतिनिधिञ्च्य दरबारात पालकमंत्री नामदार नाईक यांनी केला. या तीनही प्रशसनन्शि संबंधित अनेक समस्यांचा उलगडाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून करून घेतला.शहरात गरजेपोटी  बांधलेली घरे नियमित करत असतानाच त्यामध्ये ३१ डिसेंबर २०१३ पर्यंतच्या घरांना नियमित करावे यासाठी लेखी पत्र खासदार डॉ . संजीव गणेश नाईक , आमदार संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. लवकरच क्लस्टर विकासाबाबतचा निर्णय लागेल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात गात काही वर्षात धोकादायक इमारती कोसळून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा निर्णय लवकरच लागणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले

आजच्या या विशेष जनप्रतीनिधींच्या दरबारात उपस्थित अधिकारी आणि नागरिकांना विकासकामांविषयीच्या काही माहितीपूर्ण  चित्रफिती दाखवण्यात आल्या. त्यामध्ये फेरीवाला धोरण , खैरणे बोनकोडे क्लस्टर विकासाची योजना, जाहिरात धोरण, वन टाईम योजने अंतर्गत बेलापूर सेक्टर -१५ चा होणारा विकास या बाबींचा समावेश होता. भविष्यात नवी मुंबईत तयार होणाऱ्या अंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईवर पडणाऱ्या भविष्यकालीन वाहतुकीच्या ताणाबाबत देखील यावेळी चर्चा झाली. त्यानुसार ठाणे बेलापूर मार्गावर ४ आणि पाम बीच मार्गावर ४ असे एकूण ८ नवे उड्डाणपूल एमएमआरडीए बांधणार असल्याचे आयुक्त मदान यांनी सांगितले. त्याकरिता एकूण ४६० कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्याशिवाय कल्याण येथून नवी मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी तसेच नवी मुंबईतून कल्याण येथे जाणाऱ्या नागरिकांसाठी ऐरोली येथील डोंगरातून बोगदा तयार करण्यात येणार आहे. ऐरोली ते कल्याण (कटाई) दरम्यान ४०० कोटी रुपये खर्चून हा नवा मार्ग प्रस्तावित आहे. कोपरखैरणे ते घाटकोपर दरम्यान खाडीवर ७ कि. मी. लांबीचा नवा पूल प्रस्तावित आहे. नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील या विकास प्रकल्पांबाबत काही दिवसांपूर्वी पालकमंत्री नामदार नाईक यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही आयुक्त मदान यांनी सांगितले.

सिडकोचे व्यवस्थापकीय- संचालक संजय भाटीया यांनीही याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली लावण्याच्या अनुषंगाने सिडको प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्याशिवाय धार्मिक स्थळे, अंत्यविधी करिता जागा यासाठीही सिडकोने रिलिझेस पॉलिसी तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले. त्यामार्फत ९८ भूखंड जाहिरातीच्या माध्यमातून वितरीत केले जाणार असल्याचे भाटीया म्हणाले. नागरिकांची गरज लक्षात घेऊन सिडको तर्फे प्रतिवर्षी ८ हजार घरांची निर्मिती केली जाणार असल्याचे देखील भाटीया यांनी सांगितले. पालकमंत्री नामदार नाईक यांनी यावेळी सिडकोने शहराचा विकास करताना नवी मुंबईत संक्रमण शिबिरे उभारली नसल्याची खंतही व्यक्त केली. नवी मुंबईकरांसाठी सिडकोने जमिनी आणि घरे फ्रीहोल्ड करावीत अशी सूचनाही नामदार नाईक यांनी भाटीयांना केली. सिडकोतर्फे पालिकेला ४२९ सुविधा भूखंड देण्यात येणार असून त्यापैकी ४५ भूखंड हस्तांतरित केले असल्याची माहिती एम. भाटीया यांनी दिली. पालकमंत्री ना.नाईक यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सायन- पनवेल मार्गावर वाशी ते सीबीडी आणि नवी मुंबईतील रेल्वे मार्गाभोवतीभिंत बांधण्याची तयारीही भाटीया यांनी दर्शवली. घणसोली विभाग हा पालिकेकडे वर्ग करण्यापूर्वी खारघर प्रमाणे त्याचा विकास करावा अशी सूचना नामदार नाईक यांनी सिडकोला केली. नवी मुंबईतील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणे यांना आळा घालण्यासाठी सिडको, पालिका व पोलिस यांची एकत्रित गस्त होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

jan1 jan2

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube